गुळगुळीत गोट्यांकडून सणसणीत
- हर्षल कंसारा
कालचा लोकसत्ताचा संघ
आयोजित ज्ञानसंगमावरील अग्रलेख वाचला. सुरुवातीला थोडा विचार केला की, खरच संघातून
एकही संशोधक, विचारवंत कसा तयार झाला नाही? ९० वर्षे लोक संघटीत करून कार्यकर्त्यांना
केवळ नंदीबैलासारखे संघ वागवत होता का? असा प्रश्न मनात आला. पण अचानक लक्षात आले
की, गेल्या ९० वर्षात एखादे ऑलम्पिक मेडल आणेल असा खेळाडू देखील संघाने तयार केला
नाही. दररोज शाखेत २५ मिनिटे खेळ घेऊन देखील! मग पुन्हा लक्षात आले की, एखादा मोठा
शिक्षण महर्षी म्हणता येईल असा शिक्षणसम्राट देखील तयार केला नाही. हिंदुत्वाचा
पुरस्कार करणाऱ्या संघाचा स्वयंसेवक म्हणवता येईल, असे एकही शंकराचार्य नाहीत.
अर्थतज्ञ, संरक्षण तज्ञ, देशातील एखादा नामवंत उद्योजक संघ घडवू शकला नाही. खरच संघात
घडले ते केवळ नर्मदेचे गोटे..! परंतु लोकसत्तेचे एकांगी समीक्षण वाचून मत बनवले तर
मी देखील तथाकथित संघाद्वेशी पुरोगामी गोटा ठरेल.
संघाची स्थापना झाली तेव्हाची थोडी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर कदाचित या प्रश्नांचे उत्तर मिळू शकते (अर्थात तेवढ्या प्रामाणिकतेने या प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल तर) भारताच्या स्वातंत्रपूर्व काळात संघ स्थापन झाला होता. त्यावेळची सर्व विचारधारांची प्राथमिक आवश्यकता देश स्वतंत्र्य करणे हीच होती. परंतु स्वातंत्र्य झाल्यानंतर आपण पुन्हा गुलाम होऊ नये यासाठी काय करता येईल? एवढा दुराचा विचार दुर्दैवाने कुणीही करत नव्हते. त्यामुळे संघाने यावर विचार करून काम करायला सुरुवात केली. त्यातील मुख्य भाग होता की समाज संघटीत असेल तर आपल्यावर कुणीही हक्क गाजवू शकणार नाही. हे छत्रपतींनी सिद्ध करून दाखवलेले तत्व डॉ. हेडगेवारांनी आत्मसात करून काही गुळगुळीत गोट्यांना सोबत घेऊन काम करायला सुरवात केली. संशोधन, ग्रंथ लेखन, कागदी विचार मांडणी, उद्योगधंदे करणाऱ्यांची समाजात त्यावेळी देखील कमी नव्हती. मात्र समाज संघटनेचे काम करणारे दुर्मिळ होते. म्हणून एवढे वर्ष संघटन कामात खर्ची घातले गेले. त्याचे योग्य परिणाम आज दिसत देखील आहेत. (अर्थात उघड्या डोळ्यांनी बघायची वृत्ती असल्यास)
एकदा समाज सुसंघटीत झाल्यास हवे ते आणि हव्या त्या क्षेत्रात समाज पराक्रम गाजवू शकतो. इस्त्राईलचे उदाहरण आपल्या समोर आहेच. तसे न केल्यास जाती-पती, प्रांत-भाषा, यात बरबटलेल्या वृत्तीची लोक समाजात वाळवी सारखी कामे करतात, आणि त्यामुळे महापराक्रमी राजे, ज्ञानी विचारवंत, शास्त्रज्ञ यांचे अमूल्य योगदान देखील लयाला जाते. हे मांजरेच्या गळ्यात घंटी बांधण्याचे अवघड काम जर लोकसत्ता आपल्या खांद्यावर घ्यायला तयार असेल, तर नक्कीच पुढच्या ३-४ वर्षात संघाची ढीगभर माणसे सगळी क्षेत्रे व्यापून टाकतील यावर माझा ठाम विश्वास आहे.
दुसरी गोष्ट, संघाच्या प्रारंभीच्या कालखंडात केवळ शाखा आधारित काम होते. त्यानंतरच्या काळात संघाने टप्प्या टप्प्याने शेतकरी, मजूर, विद्यार्थी, राजकीय, वनवासी, ग्रामीण, सेवा, उद्योग, अन्य ३५ पेक्षा अधिक क्षेत्रात काम करणे सुरु केले. विज्ञान या क्षेत्रात देखील गेल्या दीड दशकापासून काम संघ करत आहे, त्याचे परिणाम पुढील काही वर्षात दिसून येतीलच. राहता राहिली गोष्ट पुराण कथांची तर विविध कारणांमुळे बरबटलेल्या पराक्रमी समाजात काही लोकांनी विज्ञानाची सगळी किरणे पश्चिमेकडूनच आपणास मिळाली आहेत, असा समज पसरवत, आपले ते हीन आणि दुसर्याचे ते चांगले असे बिम्बावण्याचा प्रयत्न चालवला होता, आजही त्यांची पिलावळं आहेत. त्यामुळे समाजाला बळ देण्यासाठी आपला इतिहास सांगणे गरजेचे आहे. केवळ पाश्चात्यांनाच विज्ञानाची किरणे सापडली असे मानले तर मग तो कोणता आधार आहे ज्याच्या भरवश्यावर हिंदू संस्कृती प्राचीन काळापासून आजपर्यंत टिकून आहे. जेव्हा रोम, इजिप्त, ग्रीक संस्कृती केवळ अवशेष म्हणून शिल्लक आहेत. हा देखील संशोधनाचा विषय आहे. त्याचे उत्तर संघाला ठाऊक आहे, शंका असणार्यांनी त्याचा शोध लावावा. योग हे वैज्ञानिक नसते तर का म्हणून संपूर्ण विश्व आरोग्य चांगले राहावे यासाठी योग शिकण्याच्या धडपडीत पडला असता? त्याला वौश्विक मान्यता संघाचे स्वयंसेवक असलेल्या पंतप्रधानांनीच मिळवून दिली, विज्ञाननिष्ठ पुरोगामी गोट्यांनी नव्हे. अशा अनेक मान्यता येत्या काळात संघ प्राचीन भारतीय विज्ञानाला मिळवून देईल, यात मला तिळमात्र शंका नाही, म्हणूनच तर ज्ञानसंगम घेण्याची नांदी संघाने केली आहे. तो पर्यंत कुणी नंदीबैल म्हणून हिणवले तरी देखील संघ स्वयंसेवक मागे हटणार नाही हे देखील तेवढेच खरे.
- संघाचा एक गुळगुळीत गोटा
छान लिहिले आहे. संघ समजणे अवघड आहे. संघाची संघटनेची गती समजणे त्याहून अवघड. अपंगाच्या क्षेत्रात काही वर्षापूर्वी सुरु झालेले सक्षम आज सर्व प्रांतात सक्रिय व चांगले काम करते आहे. वनवासी कल्याण आश्रमाने सर्वागीण उन्नती साठी प्रयत्न केले वनवासी तरुण खिलाडू तयार केले.कविता राऊत वस्तीगृहात शिकत होती. प्रज्ञाप्रवाह हे काम सुरु झाले आहे. त्याचे परिणामही लवकरच दिसतील. टिका करणारे तेच काम करतील. संघ वाढत जाईल. जे जवळ आले त्याना ध्यानात आले. संघ हे आश्वासन आहे.उपेंद्र कुलकर्णी
ReplyDelete